नारीशक्तीच्या आंदोलनाला अखेर यश
शहापूर: शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात नारीशक्ती संघटनेने २५ ऑगस्ट रोजी मंगळागौरीच्या दिवशी केलेल्या आक्रमक आंदोलनाला अखेर यश आले आहे. महिलांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत महामार्गाच्या रखडलेल्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
शहापूर-मुरबाड-पाटगाव -खोपोली हा मार्ग या अनेक गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे, धुळीचे साम्राज्य, पावसाळ्यात निर्माण होणारा चिखल आणि ठिकठिकाणी अपूर्ण राहिलेली कामे यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते.या प्रश्नाबाबत नागरिकांकडून वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अपेक्षित वेगाने कार्यवाही होत नसल्याने अखेर नारीशक्ती संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. २५ ऑगस्ट रोजी मंगळागौरीच्या दिवशी नडगाव परिसरातील महिलांनी रस्त्यावर उतरून तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला परिसरातील महिला व पुरुष नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
नडगाव, भटपाडा, साखरपाडा, शिरगाव, लेनाड, दोनघर, नेहरोली, शेंद्रूण आदी गावांतील महिलांनी या आंदोलनाला पाठिंबा देत रस्त्याच्या प्रश्नावर एकजूट दाखवली. महिलांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत केवळ आश्वासन नको तर प्रत्यक्ष काम सुरू झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली होती.दरम्यान आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता तहसीलदार परमेश्वर कासुले यांनी आंदोलक महिलांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून नायब तहसीलदार सदानंद घुटे आणि पोलीस निरीक्षक विलास कदम यांना आंदोलक महिलांना लेखी पत्र देऊन महामार्गाचे काम सुरू करण्याबाबत आश्वासन दिले होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. दरम्यान महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने नारीशक्ती संघटनेच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.